मुंबई : आज मुंबईत Siemens AG च्या व्यवस्थापकीय मंडळाच्या सदस्या Veronika Bienert आणि Siemens Limited चे व्यवस्थापकीय संचालक व मुख्य कार्यकारी अधिकारी Sunil Mathur यांच्यासोबत अत्यंत फलदायी व दूरदर्शी बैठक पार पडली. या बैठकीत महाराष्ट्राच्या पायाभूत सुविधा, तंत्रज्ञान, कौशल्य विकास आणि भावी शहरी नियोजनाच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण विषयांवर सखोल चर्चा करण्यात आली.
भारतामध्ये १५० हून अधिक वर्षांची भक्कम परंपरा असलेल्या सिमेन्सने देशाच्या औद्योगिक आणि तांत्रिक प्रगतीत मोलाचे योगदान दिले आहे. विशेषतः पायाभूत सुविधा, आरोग्य सेवा, ऊर्जा व्यवस्थापन, स्मार्ट तंत्रज्ञान आणि वित्तीय सेवा क्षेत्रांमध्ये सिमेन्सने आपली ठोस उपस्थिती निर्माण केली आहे. महाराष्ट्रातील त्यांच्या दशकांपासूनच्या कार्याचा आढावा घेताना प्रतिनिधीमंडळाने राज्यातील औद्योगिक प्रगती आणि वेगवान पायाभूत विकासाबद्दल समाधान व्यक्त केले.
महाराष्ट्रातील वाढत्या गुंतवणुकीच्या संधींविषयी सकारात्मक भूमिका व्यक्त करत सिमेन्सने राज्यात आणखी विस्तार करण्याची उत्सुकता दर्शविली. विशेषतः डेटा सेंटर, हरित ऊर्जा, स्मार्ट सिटी प्रकल्प आणि आधुनिक परिवहन व्यवस्थांमध्ये सहकार्य वाढविण्याची तयारी दर्शविण्यात आली. महाराष्ट्र हे भारताच्या डेटा सेंटर क्रांतीचे उदयोन्मुख केंद्र म्हणून वेगाने पुढे येत असून, या क्षेत्रात सिमेन्ससारख्या जागतिक तंत्रज्ञान कंपनीची भागीदारी राज्यासाठी अत्यंत महत्त्वपूर्ण ठरणार आहे.
रायगड जिल्ह्यातील सिमेन्सच्या कौशल्य विकास उपक्रमांचा विशेष उल्लेख करण्यात आला. स्थानिक युवकांना आधुनिक तंत्रज्ञानाचे प्रशिक्षण देऊन भविष्यासाठी सक्षम मनुष्यबळ तयार करण्याच्या या उपक्रमांमुळे उद्योग क्षेत्राला आवश्यक असलेले प्रशिक्षित कौशल्य सहज उपलब्ध होत आहे. यामुळे ग्रामीण आणि शहरी भागातील रोजगाराच्या संधींनाही मोठी चालना मिळत आहे.
बैठकीदरम्यान आगामी विकास प्रकल्प, नवीन विमानतळ उभारणी, नियोजित शहरीकरण आणि भविष्यातील शहरांसाठी सर्वसमावेशक मास्टर प्लॅन तयार करण्याच्या धोरणावर चर्चा झाली. “विकसित महाराष्ट्र 2047” या दूरदृष्टीपूर्ण संकल्पनेअंतर्गत राज्याला जागतिक दर्जाचे औद्योगिक, तांत्रिक आणि शाश्वत विकासाचे केंद्र बनविण्याचा निर्धार पुन्हा अधोरेखित करण्यात आला.
महाराष्ट्र सरकार आणि सिमेन्स यांच्यातील ही सकारात्मक आणि धोरणात्मक भागीदारी राज्याच्या सर्वांगीण विकासाला नवे बळ देणार असून, उद्योग, तंत्रज्ञान आणि रोजगारनिर्मितीच्या नव्या पर्वाची सुरुवात ठरणार आहे.