नवी दिल्ली :नवी दिल्ली येथे संसदेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर शिवसेना खासदारांची काल महत्त्वपूर्ण बैठक घेण्यात आली.

या बैठकीत अधिवेशनातील विविध कामकाज, अर्थसंकल्पावरील चर्चा तसेच देशासमोरील सध्याच्या आव्हानांच्या पार्श्वभूमीवर पक्षाची भूमिका याबाबत सविस्तर चर्चा करण्यात आली.
सध्याच्या युद्धजन्य परिस्थितीमुळे देशासमोर निर्माण होणाऱ्या संभाव्य आर्थिक आणि पुरवठा साखळीशी संबंधित आव्हानांवरही यावेळी विचारमंथन झाले. देशहित आणि जनतेच्या हिताला प्राधान्य देत केंद्र सरकारच्या धोरणांना भक्कम पाठिंबा देण्याची भूमिका या बैठकीत स्पष्ट केली.
यावेळी सर्व शिवसेना खासदारांना मार्गदर्शन करताना अर्थसंकल्पीय अधिवेशनात जनतेचे प्रश्न प्रभावीपणे मांडण्याचे आणि विरोधकांकडून पसरविल्या जाणाऱ्या खोट्या नॅरेटिव्हच्या विरोधात कठोर भूमिका घेण्याचे आवाहन केले.
शिवसेना हा एनडीएचा महत्त्वाचा घटकपक्ष असून, संसदेत आक्रमक आणि रचनात्मक भूमिका घेऊन महाराष्ट्र व देशाच्या हितासाठी काम करण्याचा निर्धार यावेळी व्यक्त केला.
यावेळी केंद्रीय राज्यमंत्री प्रतापराव जाधव, खासदार डॉ.श्रीकांत शिंदे, खासदार मिलिंद देवरा, श्रीरंग बारणे, रवींद्र वायकर, धैर्यशील माने, नरेश म्हस्के, शिवसेना सचिव भाऊसाहेब चौधरी उपस्थित होते.
