पिंपरी-चिंचवड शहरातील पाणीपुरवठा सुधारण्यासाठी उपाय योजना.

पिंपरी: १८ एप्रिल: पिंपरी-चिंचवड शहरातील पाणीपुरवठा सुधारण्यासाठी स्थायी समिती अध्यक्ष अभिषेक बारणे यांनी १५ दिवसांत आराखडा सादर करण्याचे आदेश दिले.
पिंपरी : ‘पिंपरी-चिंचवड शहरातील पाणीपुरवठ्यासाठी पवना, आंद्रा आणि भामा आसखेड जलवाहिनी योजना मार्गी लावा. पाणीगळती रोखणे आणि सांडपाणी पुनर्वापरावर भर द्या. त्यासाठी किती खर्च अपेक्षित आहे, याबाबतचा दीर्घकालीन आराखडा (मास्टर प्लॅन) १५ दिवसांत सादर करा,’ असे आदेश पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या स्थायी समितीचे अध्यक्ष अभिषेक बारणे यांनी प्रशासनाला दिले.
‘पाण्यासाठी नवीन स्रोत निर्माण करणे आवश्यक आहे. पाण्याची गळती रोखणे गरजेचे आहे. पाणी पाणीपुरवठ्याची कोणती आणि किती कामे करावी लागणार आहेत, त्यासाठी खर्च किती अपेक्षित आहे, त्याचा आराखडा तयार करण्याचे प्रशासनाला सांगितले आहे. त्यानुसार नियोजन करून प्राधान्याने पाणीपुरवठ्याची कामे केली जाणार आहेत,’ असे बारणे यांनी सांगितले. स्थायी समितीची नुकतीच बैठक झाली. त्या वेळी त्यांनी हे आदेश दिले. तसेच, या बैठकीत विविध कामांविषयीचे निर्णय झाले.
